आपल्याकडे कांदे पोह्याचा कार्यक्रम म्हटला की “यन्दा कर्तव्य आहे” हे सहज लक्षात येते…पण हया कार्यक्रमाच्या प्रसंगी कांदे पोहेच का करतात हे मला अजुनही उमगत न्हवत. नाही म्हणजे हल्ली क्रिमची बिस्किटे आणि चिवडयाने पण काम चालून जाते…हल्ली आपला कल रेडीमेड आणि इन्स्टंट गोष्टींकडेच जास्त असतो आणि त्यातून अमूक अमूक गोष्ट आमच्या छकु ने केलीय हो..अस म्हणणं सुद्धा ६० च्या दशकाच्या क्रुष्ण धवल चित्रपटातल्या आईने म्हटल्यासारख वाटत…आणि त्याहूनही व्यवहारीक गोष्ट ही असू शकते की आज काल मुला–मुलींच्या अपेक्षांचा दर्जा आणि दायरा एवढा रुंदावलाय की त्यामुळे एक दोन कार्यक्रमांमधेच स्थळ निश्चित होइलच याची शाश्वती नाही…तेव्हा किती वेळा कांदे पोहे बनवणार हो? 😉
पण तरीही अजूनही स्थळ पाहण्याच्या कार्यक्रमाला सर्रास कांदे पोहेच बनवले जातात..मग कांदे पोहेच का बर या विषयावर मन घुटमळायला लागल. त्यामागे काहितरी कारण असणारच यावर माझा ठाम विश्वास आहे. कारण परंपरेने चालत आलेल्या बरयाच गोष्टींमागे काहितरी विचार हा असतोच बरेचदा आपल्या मोठ्ठ्यांना ते कारण ठाउक नसतं तरीहि ते त्यांच अंधानुकरण करतात आणि आपल्यालाही करायला सांगतात म्हणून आपल्याला त्या निरर्थक वाटतात….
तर सांगायचा भाग हा की हा लेख लिहिण्याच्या निमित्ताने पोह्यांची रेसिपी माझ्या नजरेसमोरून सरकायला लागली…आणि त्याचा मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमाशी काय बर संबंध असावा यावर माझी विचार चक्र सुरू झाली. आणि मला जाणवलं की कांदे पोह्याच्या ह्या पाक क्रुतीमधे स्वादातले जवळपास सगळे रस अंतर्भूत झालेले असतात….
भिजवलेल्या पोह्यांचा नरमपणा, भाजलेल्या शेंगदाण्यांचा खुसखुशीतपणा, लिंबाचा किंचितसा आंबटपणा आणि थोड्याशा साखरेचा गोडवा, हिरव्या मिरचीचा तिखटपणा, कांद्याने आणि राई जिरयाच्या फोडणीने आलेली चव आणि वरून पेरलेल्या कोथिंबिरीची मेहक…..इतक्या वेगवेगळ्या गोष्टी आणि त्याची तितकीच वेगवेगळी चव….पण तोंडात पडले की सगळ कस एकजीव आणि चवदार…..लग्नानंतरच आयुष्य ही मुला–मुलीने असच एकजीव होऊन चवदार बनवाव असा त्यामागचा उद्देश असेल का?
करकरीत सुकवलेले जाडे पोहे कढईत टाकण्यापुर्वी पाण्यात भिजवुन नरम करतात तसच संसारात पडताना आपले ईगो, स्वभावातला ताठरपणा सगळ कस भिजवून दूसरया गोष्टी शोषून घेण्यासाठी ओलावा धरायला हवा. तापलेल्या तेलावर जशी राई–जीर आणि मिरची ची फ़ोडणी होते, राई तडतडते, कढईतून बाहेर ऊडू पाहते, मिरची चुरचुरते, फोडणीला तिखट करते, तिच्या तिखट वाफ़ा येतात…मग आपण त्यात बारिक चिरलेला कांदा आणि शेंगदाणे टाकतो आणि सर्व चुरचुराट शांत होतो….अगदी तशीच संसारात भांड्याला भांडी लागतात, कधी कधी घरातले वातावरणही तापते, वाद होतात, चीड चीड होते, नात्यांमधे तिखटपणा येतो.पण हे सारं क्षणिकच असाव ह्या फोडणीप्रमाणे. ती करपायच्या आधीच त्यात जसा कांदा टाकतात तसच वाद विकोपाला जाण्याआधी नात्यांमधे प्रेमाचा आणी समजुतदारपणाचा थंडावा यायला हवा…..
कांद्याचा कच्चेपणा जाइपर्यंत, तो गुलाबी होईपर्यंत आपण जस त्याला मंद आचेवर शिजवतो तसचं हळू हळू आपल्या प्रेमाला संसारात मुरू द्याव लागत…हळू हळू तुमच्यातला तिखटपणा कमी करून स्वभावाला सहनशीलतेच वंगण घालायला हव..कच्चे शेंगदाणे जसे तेलावर परतून खुसखुशीत होतात तसेच एकमेकांबद्द्ल असलेले समज गैरसमज दूर करुन संसारच्या मंदाग्नीवर नातं परिपक्व व्हायला हव मग सहजीवनात तसाच खुसखुशीतपणा येतो… .
हळद आणि साखर आपल्याच रंगात आणिक स्वादात सर्व पदार्थांना सामावून घेतात….ही उपमा मला मुलीला द्यावीशी वाटते. मुलीला आपल्या गोड आणि प्रसंगी खंबीर स्वभावाने तिच्या संसारातल्या सर्व घटकांमधे सामावून घेता आलं पाहीजे. स्वादानुसार मीठ म्हणजेच संसाराला रंगत यावी एवढ्याच कानपिचक्या आणि खोड्या…..नाहीतर रेसीपी खारट होईल हा!!!!!!!! 😉 भीजलेले पोहे जसे कढईत पडून वरील सगळे रस पिऊन घेतात, हळदीच्या रंगात एकजीव होतात तसचं एकमेकांच्या उणीवा, चांगुलपणा, गुणदोष सगळच पिऊन घेण्यासाठी आणि एकमेकांच्या रंगात रंगून जाण्यासाठी जोडप्याने स्वत:मधे एक आद्रता जपली पाहीजे…. पोह्यांवर लिंबू पिळून सर्व मिश्रणाला जशी वाफ़ काढतो, वरून चिरलेल्या कोथिंबीरिची आणि ओल्या नारळाच्या किसाने सजावट करतो तसच छोट्या छोट्या आनंदाच्या, रुसव्या फ़ुगव्याच्या, आंबट तिखट क्षणांनी संसार खुलवायला हवा..मग संसाराच्या गरमागरम कांदे पोह्याची चव जीभेवर कायम रेंगाळत राहील….
मला माहीत नाही लग्नासाठी मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमामधे कांदे पोह्याचा काय रोल आहे…पण माझ्या बुद्बीला पटेल सुचेल तस मी त्याचा अर्थ लावला…त्याचा योग्य अर्थ कुणास ठाऊक असेल तर जरूर कळवा. हा लेख लिहीता लिहीता सनई चौघडे या चित्रपटामधील गाण ओठावर आलं आणि म्हणून पटकन गूगल सर्च मारून त्याचे lyrics मिळवले…..
भिजलेल्या क्षणांना आठवणींची फ़ोडणी,
हळदीसाठी आसुललेले हळवे मन आणि कांती
आयुष्य हे चुलीवरच्या कढईतले कांदे पोहे…..
नात्यांच्या ह्या बाजारातून विक्रेत्यांची दाटी,
आणि म्हणे तो वरचा जुळवी शतजन्मांच्या गाठी,
रोज नटावे रोज सजावे धरून आशा खोटी,
पाने मिटुनी लाजाळूपरी पुन्हा उघडण्यासाठी
आयुष्य हे चुलीवरच्या कढईतले कांदे पोहे…
दूरदेशीच्या राजकुमाराची स्वप्ने पाहताना,
कुणीतरी यावे हळूच मागून ध्यानीमनी नसताना
नकळत आपण हरवून जावे स्वतास मग जपताना,
अन मग डोळे उघडावे ही दिवा स्वप्न पाहताना
आयुष्य हे चुलीवरच्या कढईतले कांदे पोहे……..
भातुकलीच्या धुवुन अक्षता तांदुळ केले ज्यांनी,
आणि सजवला खोटा रुखवत भाड्याच्या भांड्यांनी
भविष्य आता रंगविण्याचा अट्टाहासही त्यांचा,
हातावरच्या मेहेंदीवर ओतून लिंबाचे पाणी
आयुष्य हे चुलीवरच्या कढईतले कांदे पोहे………..